केरळच्या वायनाडमध्ये सोमवारी झालेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर, डोंगराच्या माथ्यावरून आलेल्या पाण्याच्या जोरदार प्रवाहाने लहान इरुवाझिंजी नदीच्या प्रवाहाची दिशा बदलली आणि तिच्या काठावरील सर्व काही बुडवले. उपग्रहावरून घेतलेल्या छायाचित्रांमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे. टेकड्यांमधून वाहणाऱ्या इरुवाझिंजी नदीच्या मार्गावर पूर्वी जिथे हिरवळ दिसत होती, तिथे आता फक्त ढिगारा दिसतो. भूस्खलनापूर्वी नदी सरळ रेषेत वाहत होती आणि काठावर गावे वसली होती मात्र आता नदीने संपूर्ण परिसर व्यापला आहे.
भूस्खलनानंतर वायनाडमधील चार गावे उद्ध्वस्त झाली आहेत. मुसळधार पावसात चिखल, खडक आणि झाडांचे मोठे तुकडे यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. आज चुरलमळा ते मुंडक्काई दरम्यानचा 190 फूट पूल तयार होईल, अशी अपेक्षा आहे. अट्टमला, मुंडकाई आणि चुरलमला येथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आज बचावकार्य सुरू आहे.
केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनात मृतांचा आकडा २५६ वर पोहोचला आहे. केरळमध्ये निसर्गाच्या या कहरावर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. विजयन यांनी बैठकीत सांगितले की, सध्या मुख्य प्राधान्य हे अडकलेल्या लोकांची सुटका करणे आहे. बेली पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अवजड वाहनांची वाहतूक करता येणार आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा हे देखील आज वायनाडला भेट देणार आहेत. दोघेही भूस्खलनग्रस्त भागाला भेट देतील आणि पीडितांना भेटतील. याआधी राहुल गांधी बुधवारी वायनाडला जाणार होते, मात्र खराब हवामानामुळे हा प्लान रद्द करावा लागला.