मालदीवचे परराष्ट्र मंत्री मूसा जमीर यांचा भारत दौरा चर्चेत आहे. या भेटीदरम्यान त्यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची द्विपक्षीय बाबींवर भेट घेतली. यावेळी त्यांनी मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरही स्पष्टीकरण दिले.
मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींविरोधात केलेल्या आक्षेपार्ह टिप्पण्यांबाबत म्हणाले की, तुम्ही पाहिलंच असेल की, ही सरकारची भूमिका नाही आणि असं व्हायला नको होतं असं आम्ही म्हटलं होतं. . याबाबत सोशल मीडियावर गैरसमज पसरवण्यात आला. मालदीव आणि भारताच्या सरकारांना काय झाले हे समजले आहे आणि आम्ही आता त्यापलीकडे गेलो आहोत.
भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही याची काळजी आमचे सरकार घेईल, असे मुसा जमीर म्हणाले. या वर्षी जानेवारीमध्ये मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पीएम मोदींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते. मात्र, या तीन मंत्र्यांना मालदीव सरकारने निलंबित केले होते.
यापूर्वी मालदीवच्या पर्यटनमंत्र्यांनी भारतीय पर्यटकांना जास्तीत जास्त संख्येने मालदीवला भेट देण्यास सांगितले होते.
काय म्हणाले मालदीवचे पर्यटन मंत्री?
मालदीवचे पर्यटन मंत्री इब्राहिम फैसल यांनी नुकतेच सांगितले होते की, आमचे सरकार भारतासोबत एकत्र काम करू इच्छिते. आमचे लोक आणि आमचे सरकार मालदीवमध्ये येणाऱ्या भारतीयांचे मनापासून स्वागत करतील. पर्यटन मंत्री म्हणून मी भारतीयांना सांगू इच्छितो की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने मालदीवमध्ये यावे. आपली अर्थव्यवस्था खरे तर पर्यटनावर अवलंबून आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत मालदीवमध्ये जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत ४२ टक्क्यांनी घट झाली आहे. मालदीव हे भारतीय पर्यटकांचे अतिशय आवडते ठिकाण होते. मात्र दोन्ही देशांमधील तणाव वाढल्यानंतर मालदीवला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या कमी झाली. पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, या वर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान 42,638 भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिली. तर गेल्या वर्षी याच चार महिन्यांत ७३,७८५ भारतीय पर्यटक मालदीवमध्ये पोहोचले होते.
काय होतं संपूर्ण प्रकरण?
पंतप्रधान मोदी ४ जानेवारीला लक्षद्वीपच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्याची काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करून त्यांनी लोकांना लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले होते. यानंतर ६ जानेवारीला मालदीव सरकारच्या मंत्री मरियम शिउना यांनी पीएम मोदींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यांच्यानंतर आणखी दोन मंत्री महजूम मजीद आणि मलशा शरीफ यांनीही भारतविरोधी वक्तव्य केले. हा गोंधळ वाढताच मालदीव सरकारने तिन्ही मंत्र्यांना निलंबित केले.